सणासुदीच्या दिवसात खरेदी करण्याची भारतीयांची मानसिकता आहे. त्यातच गुढीपाडवा, गुरूपुष्यांमृत योग, अक्षयतृतीया आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये सोनं खरेदीकडे सर्वसामान्य माणसाचा कल असतो. दोन दशकांपूर्वी सर्वसामान्य माणसासाठी गुंतवणूकीचे मर्यादित प्रकार अस्तित्वात होते. त्यातलाच एक आवडता गुंतवणूक प्रकार आहे सोने. काही वर्षांपूर्वीपर्यंत सोन्यातून मिळणारा परतावा चांगला असायचा. संपत्तीची वृद्धी करणारा असायचा.
त्याचबरोबर सोने खरेदीला एक भावनिक किनारही असते. मुलामुलींच्या लग्नात दागदागिने करण्यासाठी सोन्याची आवश्यकता भासते. त्यातच सोन्याला सामाजिक प्रतिष्ठासुद्धा आहे. यामुळेच सोनेखरेदी हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
परंतु या दृष्टीकोनांमध्ये आता काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. संपत्तीची वाढ तेव्हाच होते जेव्हा आपल्याला गुंतवणूकीतून मिळणारा परतावा हा महागाई दरापेक्षा जास्त असतो.
म्हणजेच दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमती लक्षात घेता महागाई दर 7 ते 8 टक्कयांच्या जवळपास असतो. याचाच अर्थ जी गुंतवणूक आपल्याला 8 टक्के किंवा 8 टक्कयांपेक्षा कमी परतावा देईल तिच्यातून संपत्ती निर्माण होणार नाही. सोन्यातून मिळणारा परतावा 8 ते 10 टक्कयांच्या दरम्यान आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत सोन्यातील गुंतवणूकीतून जवळपास 9 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात तर सोन्याने याहीपेक्षा कमी परतावा दिला आहे. याचाच फार पूर्वीपासून गुंतवणूकीचा आवडता पर्याय असलेलं सोनं आता तितकसं फलदायी राहिलेले नाही. त्याउलट गेल्या दोन दशकात त्यातही गेल्या दशकांत गुंतवणूकीचे काही नवीन पर्याय बाजारात आले आहेत.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा त्यातलाच एक प्रकार. म्युच्युअल फंडांच्या डेट फंड या प्रकारांनी 12 ते 13 टक्कयांचा परतावा गेल्या दशकात दिला आहे.
तर इक्विटी या तुलनात्मकरित्या जोखीम थोडी जास्त असणाऱ्या प्रकारांनी 15 ते 20 टक्के अगदी 25 टक्कयांपर्यंतसुद्दा परतावा दिला आहे. म्युच्यअल फंडांत गुंतवणूकदाराचे वय, गुंतवणूकीचा कालावधी, जोखीम घेण्याची क्षमता यानुसार वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
त्यातच दिर्घकालीन गुतंवणूकीसाठी एकरकमी गुंतवणूकीचीसुद्धा आवश्यकता नाही. एसआयपी म्हणजेच सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या प्रकाराने आपण दर महिन्याला अगदी 500 रुपयांचीसुद्धा गुंतवणूक करू शकतो. एसआयपीच्या छोट्याशा गुंतवणूकीतून मिळणारे फायदे मात्र प्रचंड आहेत. कारण एसआयपीत गुंतवणूकीतून मिळणारा परतावा हा चक्रवाढ पद्धतीने मिळत असतो. त्यामुळे शेवटच्या वर्षांमध्ये गुंतवणूकीच्या रकमेत आश्चर्यकारकरित्या वाढ होते.
उदा. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा रमेश दरमहा 1000 रुपयांचे सोने विकत घेतो आहे. या पद्धतीने रमेश 15 वर्षं गुंतवणूक करतो आहे. तर त्याचा मित्र सुरेश हा दरमहा 1000 रु एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवतो आहे.
सुरेशसुद्धा 15 वर्षं गुतंवणूक केली आहे. पण त्यांना मिळणाऱ्या परताव्यात मात्र प्रचंड अंतर असणार आहे. साधारणपणे 9 टक्कयांच्या परताव्याने रमेशला मिळतील 3.8 लाख रुपये. यात रमेशने गुंतवलेली मूळ रक्कम असेल 1.8 लाख रुपये. तर सुरेशला जवळपास 20 टक्कयांच्या परताव्याने मिळतील तब्बल 11.3 लाख रुपये. तर त्याची मूळ गुंतवणूक रक्कम असेल 1.8 लाख रुपये.
म्हणजेच रमेश आणि सुरेश यांनी दोघांनीही समान म्हणजे 1.8 लाख रुपये गुंतवले पण रमेशला मिळाले फक्त 3.8 लाख तर सुरेशला मिळाले 11.3 लाख रुपये.
ही जादू आहे एसआय़पीतून चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या घवघवीत पतताव्याची. याचा अर्थ सोन्यात अजिबातच गुंतवणूक करू नये असा नाही मात्र सोन्यात गुतंवणूक करताना तुमच्या सोन्यासारख्या पैशांचे नेमके काय होणार याचा विचार नक्की करा.