आजकाल सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंबसुद्धा मर्यादित ठेवण्याकडे असणारा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. बहुतांश लहान कुटुंबे दिसतात आणि कुटुंबात एक किंवा दोनच मुले असल्याचे दिसून येते. या मुलांची जास्तीतजास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या चांगल्या सुविधा देण्याकडे पालकांचा प्रयत्न असतो. मात्र, आपल्याला आणखी एक अपत्य असल्याची व त्याची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून येतात.
हे अपत्य म्हणजे आपल्याकडे असणारा "पैसा.' या अपत्याचीसुद्धा मुलांप्रमाणेच जास्तीतजास्त काळजी घेऊन त्याचे योग्य संगोपन आणि आर्थिक नियोजन करून त्यात वाढ घडवून आणणे गरजेचे असते. विशेष म्हणजे मुले मोठी झाल्यावर नोकरी-व्यवसायामुळे आपल्या सोबत राहतीलच असे नाही आणि पालक म्हणून त्यांच्या प्रगतीच्या आड न येता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देणेच योग्य असते. मात्र, याचबरोबर तुमच्याकडे असणाऱ्या संपत्तीचे सुरुवातीपासून वेळोवेळी आवश्यक ती काळजी घेऊन आर्थिक नियोजन केले तर त्यात वृद्धी तर होईल. शिवाय हे अपत्य सेवानिवृत्तीनंतर निश्चितच काळजी घेईल.
या अपत्याची नेमकी काळजी कशी घ्यावी?
समजा आज तुमचे वय 30 वर्षे आहे व तुम्ही 60 व्या वर्षी नोकरी/व्यवसायातून निवृत्त होणार आहात, असे गृहीत धरल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल, तर आजपासूनच आणखी एका अपत्याचे मुलांसोबतच संगोपन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपल्याला किती "रिटायरमेंट कॉर्पस' आवश्यक आहे, याचा अभ्यास करून त्यानुसार आवश्यक ती गुंतवणूक नियमित केली पाहिजे. शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीस सुरुवात करावी.
उदा : सध्या आपल्याला दरमहा खर्चासाठी 50 हजार रुपये लागत असतील, तर साधारण एवढ्याच रकमेची त्यावेळी गरज असणार आहे. (जरी मुलांसाठीचे काही खर्च कमी झाले तरी वैद्यकीय खर्च वाढतात) सेवा निवृत्तीनंतर (30वर्षांनी) आजच्या 50 हजार रुपयांची गरज भागविण्यासाठी त्यावेळचे सुमारे 2.5 लाख रुपये दरमहा सुरुवातीस मिळणे गरजेचे आहे. तुम्ही पुढे 20 वर्षे हयात (वयाच्या 80 पर्यंत) असाल असे गृहीत धरल्यास या रकमेतही महागाईनुसार वाढ होणार आहे.( या ठिकाणी भविष्यातील महागाई 5.5 ते 6 टक्के दराने वाढणार आहे, असे गृहीत धरले आहे.)
त्या दृष्टीने 60 वर्षी तुमच्याकडे सुमारे रु.5 कोटी इतका रिटायरमेंट कॉर्पस असणे आवश्यक आहे. असे असले तरी तुमचा पीएफ सरासरी 20 हजार रुपये दरमहा पुढील 30 वर्षांपर्यंत जमा होणार असेल तर सेवानिवृत्तीच्या वेळी सुमारे 3 कोटी मिळतील. म्हणजे, आता उर्वरित रु.2 कोटींचीच तरतूद करावयाची आहे. ही तरतूद दरमहा पुढील 30 वर्षे केवळ 7000 ते 9000 नियमित गुंतवणूक करून सहजरीत्या करता तेईल. (अशी गुंतवणूक पीपीएफ, एनपीएस, तसेच इक्विटी म्युचुअल फंडात दरमहा जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार करावी). या नियोजनात काही कारणाने व्यत्यय आला तर तरतूद करणे आवश्यक असते. आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही रक्कम पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. अशा रीतीने आणखी एका अपत्याचे संगोपन केल्यास सेवा निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहून सेवानिवृत्तीचा आनंद घेता येईल.
लेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत.